News not found!
दहावीच्या पुढील मुलांबरोबरच्या कामाची कल्पना ही आम्ही सुरवातीच्या काळात केली नव्हती. पण नंतर मात्र आम्हाला जाणवलं की या टप्प्यावर जर मुलांना मदत केली नाही तर एकतर ती पुढे शिकत नाहीत किंवा कलाशाखेत प्रवेश घेतात. त्यामुळे घेतलेल्या औपचारिक शिक्षणाचा त्यांना पायावर उभं रहाण्यासाठी काहीच उपयोग होत नाही. म्हणून दहावी पास झालेल्या मुलांना व्यवसाय मार्गदर्शन आणि शिक्षणासाठी आर्थिक मदतीच्या प्रकल्पाची योजना ठरली.
दरवर्षी मे-जूनमधे खेळघराच्या मित्र-मैत्रिणींना आर्थिक मदतीचे आवाहन केले जाते, त्यातून निधी जमा होतो. या योजनेतनं आजवर २५ मुले उच्चशिक्षण घेत आहेत.
या बरोबरच मुलांच्या सामाजिक जाणिवांचा विकास व्हावा म्हणून काम होते. वर्ग - जात - लिंगभाव समानता, स्वातंत्र्य, शोषण, राजकारण अशा विविध विषयांवर चर्चा होते. मुलं त्यांचे स्वतःचे प्रकल्प करतात. खेळघरातनं घेतलेल्या मदतीची परतफेड म्हणून त्यांनी सामाजिक काम करण्याची अपेक्षा असते. काही मुलांनी एकत्र येऊन भालेकर वस्ती या कचरा वेचकांच्या वस्तीत खेळघर सुरू केले आहे.